लोकसंस्कृती, लोकपंरपरा रक्षक शाहीर साबळे

महाराष्ट्राला शाहिरांची मोठी दैदीप्यमान परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे नाव विशेषत्वाने महाराष्ट्र लोकपरंपरा, लोकगीत, लोकसंगीताच्या अनुषंगाने अभिमानाने घेतले जाते. त्यांनी लोकसंस्कृती आणि लोकगीतात अनेक प्रयोगात्मक स्वरूपात बदल केले ते महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि विदेशात देखील महाराष्ट्र लोकपरंपरा पोहोचवल्या त्या लोकप्रिय झाल्या त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. आज त्यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावरील काही पैलूवर टाकलेला प्रकाश. – संपादक
कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर, १९२३ – तर मृत्यू २० मार्च, २०१५ रोजी झाला. हे एक मराठी सामाजिक लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत (सध्या राज्य गीत) आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या लोकसंगीतातील विशेष प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात . महाराष्ट्रातील मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक आहेत . शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख ज्यात पारंपरिक गाणी, गवळण, लावणी, अभंग, भारुड यांना प्रसिद्धी दिली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.आज जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र शासनाने राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. यातील दोन कडवी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून सन 2023 स्वीकारले आहे.
ते बालपणी मामाकडे अमळनेरला होते. तेव्हा साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील यांची मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासातच साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.
इ.स. १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वतःला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या ‘आंधळं दळतंय’ या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता. शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती ‘तोफ’ होती.
त्यांची जी गाणी अजरामर झाली त्यात
अशी ही थट्टा (तमाशागीत)
आई माझी कोणाला पावली (भक्तिगीत)
आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
आठशे खिडक्या नऊशे दारं (लोकगीत)
आधी गणाला रणी आणला (गण)
आधुनिक मानवाची कहाणी (कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा)
आम्ही गोंधळी गोंधळी.. (गोंधळगीत)
जय जय महाराष्ट्र माझा (महाराष्ट्रगीत)
जेजुरीच्या खंडेराया जागराला (जागरगीत)
तडा तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे (आंधळ दळतंयमधील एक पोवाडा)
दादला नको ग बाई (भारूड)
नवलाईचा हिंदुस्थान
पयलं नमन हो करीतो (गण)
फुटला अंकुर वंशाला आज (समाजजागृती गीत)
बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
महाराज गौरीनंदना (गण)
महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
मायेचा निजरूप आईचा (भावगीत)
मुंबईगं नगरी बडी बाका ((आंधळं दळतंय मधील एक गीत)
मुंबावतीची लावणी
या गो दांड्यावरना बोलते (कोळीगीत)
या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
विंचू चावला (भारूड)
यासह अनेक गीते भारुडे भक्ती गीते कोळीगीते स्फूर्ती गीते प्रसिद्ध आहेत. ते केवळ गायक गीतकार नव्हते तर नाट्यलेखन देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये
आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
आंधळं दळतंय (मुक्तनाट्य; पहिला प्रयोग १३-८-१९६६ला मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात, २५वा शिवाजी मंदिरात आणि १००वा पुन्हा रवींद्रमध्ये झाला.)
इंद्राच्या दरबारातील तमासगीर (प्रहसन)
एक नट अनेक सम्राट
कोड्याची करामत
कोयना स्वयंवर
चित्रगुप्ताच्या दरबारातील दारुड्या
ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
नशीब फुटकं साधून घ्या
नारदाचा रिपोर्ट
बापाचा बाप (मुक्त नाट्य)
माझा पवाडा (आत्मचरित्र)
मीच तो बादशहा ही नाटकं विशेष गाजली.
महाराष्ट्राच्या लोक परंपरा आणि लोकसंस्कृतीच्या जतन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे म्हणूनच त्यांना लोकसंस्कृती रक्षक शाहीर साबळे या नावाने देखील ओळखले जाते


