अतिवृष्टी नुकसान तात्काळ… हे काम करा

मागच्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात गेली आहेत. अनेक गावातील नदी, नाल्यांना, ओढ्यांना पूर आल्याने अनेक जण त्यात वाहून गेले आहेत व अनेक जनावरे देखिल मृत्यू पावल्याची घटना घडल्या असून अनेक गावांमध्ये पाणी शिरून घरे देखील पडली आहेत.
मे महिन्याच्या शेवटपासूनच यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच भरपूर मेहनत घेऊन खरीप हंगामाची 2025 ची तयारी केली होती. वेळोवेळी समाधानकारक पडत गेलेल्या पावसाने यंदा खरिपाचे पीक चांगले आणि जोमाने आल्याने शेतकऱ्याला हमखास उत्पन्नाची खात्री वाटत होती. परंतु गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यातील विविध भागात कोसळणाऱ्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. तर अनेक गावातील शेकडो हेक्टर जमीन खरवडून गेली आहे.
अस्मानी संकट बनून कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे तर मोडणार आहेच शिवाय आगामी काळात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा इशाराही शेतकऱ्याला अत्याधिक चिंतातूर र बनवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून आपली व आपली जनावरे यांचा संभाव्य धोक्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करावेत.
त्याचबरोबर यावर्षी आपण भरमसाठ पैसे भरून घेतलेल्या पीक विम्याच्या संदर्भात तात्काळ नुकसानीचे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यास शेतकऱ्यांनी विसरू नये. खरीप हंगाम 23 खरीप हंगाम 24 या दोन्ही वर्षातील पिक विमा अद्यापही हजारो शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही. यावर्षीच्या हंगामातील पिकविमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे भरून घेतला असल्याने शेतकऱ्याने तात्काळ विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी दाखल करणे देखील अनिवार्य असणार आहे. आपल्या गावात आणि मंडळात झालेल्या अतिवृष्टीची नोंद घेऊन 48 तासाच्या आत ही तक्रार करणे अनिवार्य असणार आहे.
शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागातील तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून हे पंचनामे कसे केले जातात याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा पिक विमा नुकसान भरपाई साठी तात्काळ ऑनलाईन तक्रारी दाखल करणे गरजेचे वाटते.
या संदर्भात त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व आपत्ती नियंत्रण कक्ष नागरिकांच्या मदतीसाठी दक्ष असून जिल्हा प्रशासनाचे टीम जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाज घेत आहेत.



