महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आता डिजिटल शेतीशाळा


बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPCs) यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत राहुरी, परभणी, दापोली आणि अकोला कृषी विद्यापीठांतील नामवंत कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना ऑनलाईन (Zoom आणि YouTube च्या माध्यमातून) मार्गदर्शन करणार आहेत. अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड अशा प्रतिकूल हवामानात पिके वाचवण्याचे तंत्रज्ञान, जीवामृतासारख्या जैविक निविष्ठांची निर्मिती आणि रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबाबत थेट प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या लाईव्ह सत्रादरम्यान शेतकरी शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे जागेवरच निरसन करून घेऊ शकणार आहेत.

ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, सोमवार ते शनिवार दररोज विविध पिकांसाठी झूमवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बाजरी, सोयाबीन, ख. ज्वारी, कापूस, भुईमूग, भात, राजमा, मका, नाचणी, तूर-मूग-उडीद आणि भाजीपाला या प्रमुख पिकांवर संध्याकाळी ६.१५ आणि ७.३० वाजता तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या माध्यमातून झूम ॲपद्वारे वरीलप्रमाणे(ID व Passcode वापरून) या सत्रात सहभागी होऊ शकतात. तसेच, ‘कृषी विभाग महाराष्ट्र शासन’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ च्या अधिकृत युट्यूब (YouTube) व फेसबुक चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती किफायतशीर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/