ज्येष्ठांचा अवमान हा समाजाबरोबरच राष्ट्राशीही द्रोह; डॉ.श्रीपाल सबनीस

लातूर शहरात ज्येष्ठांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या मौखिक ज्ञानाचा समृद्ध वारसा ग्रंथबद्ध होवून त्याचेही साहित्यात रूपांतर होऊन ते पुढच्या पुढे कडे हस्तांतरित व्हावे हा उद्देश या ज्येष्ठांच्या साहित्य संमेलन आयोजनामागे असावा
लातूर: ज्येष्ठांचा अवमान हा समाजाबरोबरच राष्ट्रद्रोही समजला पाहिजे असे रोखठोक प्रतिपादन समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ लातूर शाखा यांच्या संयुक्त वतीने आयोजित पहिल्या ज्येष्ठांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब टेंकाळे, समतावादी सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉ.माधव गादेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर चे अध्यक्ष एड.एस एन बोडके , साहित्यिक विलास सिंदगीकर ,साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अभियंता आर बी जोशी ,संमेलनाचे सचिव प्रकाश घादगीने यांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले.
वृद्ध ही घरातील अडगळ नसून ती समाजाची आणि राष्ट्राची संपत्ती आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, राजकारणातील ज्येष्ठत्व असो , व समाजकारणातील ते आदरणीय असते ज्येष्ठ ही सर्वकालीन आदरणीय व्यक्ती होय. ज्ञानपणाचा वसा आणि वारसा पुढील पिढीला देण्याचे काम ज्येष्ठांचे असते. माणसातील देवत्व पूजले तर घराघरात कुटुंब गाथा निर्माण होतील म्हातारपणाचा खरा अर्थ समर्पणामध्ये आणि सेवेमध्येच असतो.
महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेले आणि त्यांची स्वप्नपूर्ती करणारे हे साहित्य संमेलन आहे असे सांगून अध्यक्षीय समारोपात डॉक्टर नागोराव कुंभार म्हणाले, आयुष्याच्या संध्याकाळी आपण साहित्याचे जे चिंतन करत आहात ते महत्त्वाचे आहे. साहित्य मानवी जीवनाचा तोल सांभाळण्याचे काम करते. साहित्यातून उपेक्षितांचे चित्र प्रतिबिंबित झाले पाहिजे आणि साहित्याने समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे समाजाला सावध करण्याचे कामही साहित्याचेच आहे साहित्याच्या देवाण-घेवाणीतूनच संवाद निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला वैचारिक आधार आणि मूल्यदृष्टी मिळते.
शेवटी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अभियंता आर बी जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.



