Special Story

सिद्धारामय्या सामाजिक न्यायासाठी शासन करणारे अखेरचे समाजवादी मुख्यमंत्री

Sunday Special

राजकीय स्थित्यंतरे ही नेहमीचीच झाली आहेत. कधी ती बाहुबली नेतृत्वाच्या नावाखाली तर कधी केंद्रीय सत्तेच्या अधिपत्तेखाली किंवा नेतृत्वाखाली स्थित्यंतरा होतच आली आणि होत राहतील. पण नुकतेच झालेले कर्नाटकातील स्थित्यंतर हे थोडेसे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. माजी मुख्यमंत्री के सिद्धरामय्या हे सामाजिक जाणिवेच्या आणि सामाजिक भूमिकेच्या अनुषंगाने समाजवादी मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यशैलीबद्दल के ए शाजी यांनी घेतलेला हा वेध.

सौजन्य एएनआय

जेव्हा सिद्धरामय्या सत्तेला चिकटून न राहता मुख्यमंत्रीपद सोडून बाहेर पडतात आणि आपली कोणतीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उरली नसल्याचे उघडपणे सांगतात, तेव्हा कर्नाटक केवळ एक नेहमीचे राजकीय स्थित्यंतर पाहत नाही. तर ते भारताच्या समाजवादी राजकीय परंपरेने घडलेल्या प्रमुख लोकनेत्यांपैकी एका शेवटच्या नेत्याचा निरोप पाहत आहे. ज्या काळात राजकारण अमाप पैसा, माध्यमांद्वारे इमेज मेकिंग व त्याचे प्रदर्शन आणि कॉर्पोरेट हितसंबंधांच्या नियंत्रणाखाली आहे, त्या काळात सिद्धरामय्या हे कल्याणकारी राजकारण, सामाजिक न्याय आणि तळागाळातील लोकांना संघटित ठेवून त्यांच्याशी घट्ट नाळ ठेवून राहिले.

त्यांच्या राजीनाम्याने कर्नाटकातील एका उल्लेखनीय राजकीय पर्वाचा अंत झाला आहे. सिद्धरामय्या यांच्याप्रमाणे प्रशासकीय अनुभव, वैचारिक स्पष्टता, जनमानस आणि राजकीय चिकाटी यांचा मिलाफ साधणारा दुसरा समकालीन मुख्यमंत्री भारतात शोधणे कठीण आहे. ते कोणत्याही विशेषाधिकारातून किंवा घराणेशाहीतून पुढे आले नाहीत. ते म्हैसूर जिल्ह्यातील एका गरीब ग्रामीण पार्श्वभूमीतून अथक संघर्ष, कठोर परिश्रम आणि राजकीय दृढनिश्चयाच्या जोरावर पुढे आले. कायद्याचे शिक्षण घेतलेले आणि आपल्या कुटुंबातील पहिले पदवीधर असलेले सिद्धरामय्या समाजवादी प्रवाहातून राजकारणात आले आणि हळूहळू देवराज उर्स यांच्यानंतर कर्नाटकाने निर्माण केलेले सर्वात मोठे नेते म्हणून उदयास आले.

वारसा हक्काने किंवा प्रतिमा व्यवस्थापनातून (Image Building) तयार झालेल्या अनेक नेत्यांच्या विपरीत, सिद्धरामय्या यांनी लोकांशी कैक दशक थेट संवाद साधून स्वतःला घडवले. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात लोक चळवळीतून झाली. आरंभीला कर्नाटकातील काँग्रेसविरोधी राजकारणातून ते घडले आणि त्यांनी अर्थ, परिवहन आणि उच्च शिक्षण यांसारखी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. कर्नाटकाने पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट प्रशासक आणि अर्थमंत्र्यांपैकी एक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

परंतु सिद्धरामय्या यांचे खरे राजकीय योगदान प्रशासनाच्या पलीकडे होते. त्यांचा सर्वात मोठे योगदान म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलितांची सामाजिक आणि राजकीय आघाडी असलेल्या ‘अहिंदा’चे एकत्रीकरण. त्यामुळे कर्नाटकचे राजकीय चित्र कायमस्वरूपी बदलले. यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेले सामाजिक घटक सत्तेच्या आणि सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले. ज्या वेळी काँग्रेस पक्ष आपली वैचारिक दिशा सातत्याने गमावत होता, त्या वेळी सिद्धरामय्या यांनी पक्षाला सामाजिक न्यायाची भाषा दिली.

विडंबनात्मक बाब म्हणजे, सिद्धरामय्या स्वतः काँग्रेसविरोधी राजकारणातूनच पुढे आले. त्यांनी अनेक दशके काँग्रेसशी संघर्ष केला. पण जसजशी मागासलेल्या वर्गांमध्ये आणि अल्पसंख्याकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत गेली, तसतसे जनता दलातील काही गट त्यांना धोका मानू लागले. देवेगौडा गटाला अनेक वर्षे त्यांच्या जनआकर्षणाचा फायदा झाला, पण अखेरीस त्यांनी त्यांना राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा सिद्धरामय्या यांची राजकीय कारकीर्द संपली असे अनेकांना वाटले. पण त्याऐवजी, त्याच क्षणाने त्यांना एका मोठ्या राजकीय शक्तीमध्ये रूपांतरित केले.

जेव्हा ते काँग्रेसमध्ये सामील झाले, तेव्हा ते केवळ वैयक्तिक लोकप्रियताच नव्हे, तर एक संपूर्ण सामाजिक आघाडी सोबत घेऊन आले. काँग्रेस नेतृत्वाने त्यांची ताकद ओळखली आणि पक्षातील अनेक पारंपरिक निष्ठावंतांपेक्षा त्यांना वरचे स्थान दिले. त्यामुळे कर्नाटक काँग्रेस कायमची बदलली. सिद्धरामय्या पुढे जाऊन राज्यातील सर्वात शक्तिशाली काँग्रेस नेते बनले आणि अखेरीस कर्नाटकच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले नेते ठरले.

त्यांच्या कार्यकाळातील वर्षे सन्मान आणि सर्वसमावेशकतेवर केंद्रित असलेल्या आक्रमक कल्याणकारी राजकारणासाठी ओळखली जातात. टीकाकारांनी त्यांच्या अनेक योजनांना केवळ लोकप्रियतावाद म्हणून फेटाळून लावले. पण लाखो गरीब कुटुंबांसाठी, अन्न, उपजीविका, शिक्षण या आणि अशा योजना म्हणजे आशावादी होत्या. त्यांच्या कल्याणकारी योजनांचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर झाला. पोषण, अन्न सुरक्षा, गृहनिर्माण, शिक्षण आणि सामाजिक संरक्षण (Social Security) यांसारख्या कार्यक्रमांना त्यांच्या शासन व्यवस्थेत नि राजकारभारात केंद्रस्थानी ठेवण्यात आले.

सिद्धरामय्या यांच्या राजकारणातील एक महत्त्वाचा पण कमी चर्चिला गेलेला पैलू म्हणजे सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समाजांबद्दलची त्यांची तळमळ. देवदासी कुटुंबातील मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्याच्या त्यांच्या उपक्रमांमधून जातीय दडपशाही आणि संरचनात्मक अन्यायाबद्दलची त्यांची सखोल समज दिसून येत होती. निवडणुकीच्या काळात केवळ सामाजिक न्यायाची भाषा वापरणाऱ्या नेत्यांच्या विपरीत, सिद्धरामय्या यांनी राज्य धोरणाद्वारे कल्याणकारी योजनांना संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षाने त्यांना भ्रष्ट आणि नैतिकदृष्ट्या तडजोड केलेले म्हणून चित्रित करण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांनी त्यांना राजकीय, वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या लक्ष्य केले. तरीही, सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची विश्वासार्हता नष्ट करण्यात ते अयशस्वी ठरले. याचे कारण म्हणजे सिद्धरामय्या यांनी एक कष्टाळू -परिश्रमी, सहज उपलब्ध होणारा नेता आणि आश्वासनाला जगणारा राजकारणी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जपली होती, ज्यांना लोकांची मनापासून काळजी होती. त्यांचे टीकाकारही खासगीत त्यांच्या प्रशासकीय क्षमतेची आणि राजकीय शिस्तीची कबुली देत असत.

ज्या काळात जातीय ध्रुवीकरण सार्वजनिक जीवनावर अधिकाधिक वर्चस्व गाजवत आहे, त्या काळातही सिद्धरामय्या धर्मनिरपेक्षता आणि आरक्षणाचे खंबीर समर्थक राहिले. अल्पसंख्याक, मागासलेले वर्ग आणि घटनात्मक मूल्यांसाठी बोलण्यास त्यांनी कधीही संकोच केला नाही. एका नाजूक क्षणी त्यांनी काँग्रेसमध्ये सामाजिक न्यायाची भाषा परत आणली.

प्रत्येक दीर्घकाळ सत्तेत असलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांच्यातही विरोधाभास आणि मर्यादा होत्या. त्यांच्या सरकारांना कर्ज, गटबाजी आणि राजकीय व्यवस्थापनावरून टीकेला सामोरे जावे लागले. पण विरोधकांनीही त्यांच्या कल्याणकारी राजकारणाप्रती असलेल्या वचनबद्धतेवर किंवा त्यांच्या वैयक्तिक कार्यनिष्ठेवर क्वचितच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कर्नाटकातील सध्याचे स्थित्यंतर हे अंतिमतः काँग्रेसमधील बदलत्या सत्ता समीकरणांचा परिणाम आहे. राजकीय गणित बदलते. पिढ्या बदलतात. आघाड्या विकसित होतात. सिद्धरामय्या यांनी खुर्ची गमावली असेल, पण सामान्य लोकांच्या मनातले त्यांचे स्थान त्यांनी गमावलेले नाही. कर्नाटकातील गरीब, मागासलेले समुदाय, अल्पसंख्याक आणि ग्रामीण लोकसंख्येच्या मोठ्या वर्गासाठी, ते आजही त्यांचा सर्वात प्रमुख सशक्त राजकीय आवाज आहेत.

आज भारतीय राजकारण वैचारिक निष्ठा आणि सामाजिक चळवळींनी घडलेल्या नेत्यांच्या भयावह उणिवेने ग्रस्त आहे. सिद्धरामय्या हे अशा लुप्त होत चाललेल्या पिढीचे आहेत, जी समाजवादी संघर्ष, तळागाळातील संघटन आणि कॉर्पोरेट ब्रँडिंगऐवजी सामाजिक वास्तवात रुजलेल्या सार्वजनिक जीवनातून उदयास आलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा केवळ एका मुख्यमंत्र्याचा राजीनामा नाही. तो एका अशा राजकीय परंपरेच्या हळूहळू होणाऱ्या ऱ्हासाचे प्रतीक आहे, जिथे शासन अजूनही कल्याण, प्रतिनिधित्व आणि सामाजिक परिवर्तनाशी जोडलेले होते.

इतिहास अखेरीस सिद्धरामय्या यांना केवळ कर्नाटकचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले म्हणून नव्हे, तर ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या समाजांच्या हितासाठी सत्तेचे लोकशाहीकरण करण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या शेवटच्या प्रमुख भारतीय राजकारण्यांपैकी एक म्हणून ओळखले जातील.

राजेश खनके,पुणे
(केरळ मधील ज्येष्ठ पत्रकार के ए शाजी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/