स्टॅलिनने सत्ता गमावली, प्रतिष्ठा नाही.

दक्षिण भारतातील चार राज्यातील निवडणुका या अतिशय वादळी ठरल्या. निवडणुकी निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी थयथयाट केला तर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील डीएमके नेते स्टॅलिन यांनी संयमी नेतृत्व दाखवून राजकारणात विजय आणि पराभव महत्त्वाचा नसून निरंतरता महत्त्वाची असते हे दाखवून दिले.
तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे असोत, आणि जनक्षोभ निर्माण करण्यात पक्षाच्या प्रथम कुटुंबाने बरीवाईट भूमिका बजावली असली तरी, मी एम. के. स्टॅलिन यांना भारतीय राजकारणातील काही मोजक्या खऱ्या मुत्सद्दी नेत्यांपैकी एक मानतो.
भारतीय राजकारणात, पराभवानंतर सहसा नकार, अहंकार, मौन किंवा सूडभावना निर्माण होते. नम्रता क्वचितच. म्हणूनच निवडणुकीनंतर स्टॅलिन यांची प्रतिक्रिया इतकी स्पष्ट आणि उठावदार दिसली.
केरळमध्ये डाव्या पक्षांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर, केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी भावनिकदृष्ट्या खचलेल्या कार्यकर्त्यांचे आणि अनुयायांचे सांत्वन करणारी एक साधी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकण्याचीही तसदी घेतली नाही. अनेक वर्षे पक्षाचा बचाव करणारे हजारो सामान्य सीपीएम कार्यकर्ते निकालानंतर दिशाहीन झाले. पिनरयी यांचे मौन हीच राजकीय प्रतिक्रिया बनली.
आपल्या राजकीय प्रवासाच्या आणखी एका टप्प्यात बंगालमध्ये अपमान सहन केल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी आपण राजीनामा देणार नाही असे जाहीरपणे सांगितले. संपूर्ण भारतात, नेते अनेकदा निवडणुकीतील पराभवाला तात्पुरती गैरसोय किंवा कटकारस्थान मानतात. सामान्य कामगारांच्या भावनिक गुंतवणुकीची दखल फार कमी लोक घेतात.
पण स्टॅलिनने पूर्णपणे वेगळाच मार्ग निवडला. मतमोजणीनंतर दुसऱ्याच दिवशी, विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या एका नवख्या उमेदवाराकडून आपला स्वतःचा कोलाथूर मतदारसंघ गमावूनही, स्टॅलिन पुन्हा त्या परिसरात परतले. कोणताही राग नाही. कोणताही तमाशा नाही. कोणताही दोषारोप नाही. ते लोकांमध्ये फिरले आणि काही दशकांपासून आपल्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले. त्या परिसरातील व्हिडिओंमध्ये भावनाविवश झालेले पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष रडताना दिसत होते. अनेकांनी स्टालीन यांचे हात धरले. काहींना आपले अश्रू आवरता आले नाहीत. स्टॅलिन यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तो क्षण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता, कारण त्यातून भारतीय राजकारणात अधिकाधिक नाहीशी होत चाललेली एक गोष्ट प्रतिबिंबित झाली. लोकशाही संस्कृती.
आज मी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या चेन्नई आवृत्तीत त्यांचा तो संवाद पाहिला, ज्यात स्टॅलिन म्हणाले की, “जर विजय यांनी सरकार स्थापन केले, तर ते पुढील सहा महिने त्यांना त्रास देणार नाहीत.” त्याचबरोबर स्टालीन पुढे म्हणतात की, तामिळनाडूमध्ये अस्थिरता निर्माण करण्यात त्यांना रस नाही. लोकांना आणखी एका निवडणुकीत ओढले जाऊ नये. त्यांनी आशा व्यक्त केली की, नवीन सरकार टीव्हीकेच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासोबतच कल्याणकारी योजना सुरू ठेवेल. या पुढे जावून देखील ते म्हणतात की, सहा महिन्यांनंतरच विरोधी पक्ष म्हणून डीएमके विधायक टीका करण्यास सुरुवात करेल. ही कमजोरी नाही. ही राजकीय परिपक्वता आहे.
पराभवानंतर द्रमुकची खिल्ली उडवणाऱ्या AIADMK च्या नेत्यांना स्टॅलिन यांनी केवळ एवढेच उत्तर दिले की, द्रमुक विरोधी पक्षात बसेल. निवडणुकीतील पराभवानंतर कोणताही भावनिक उद्रेक नाही. कोणतीही हताशा नाही. तर केवळ स्पष्टता.
याठिकाणी ही एक बाब लक्षात घेतली पाहिजे की द्रमुक ही एक सामान्य निवडणूक यंत्रणा नाही. आधुनिक भारतातील सर्वात वैचारिकदृष्ट्या दृढ द्रविड चळवळींपैकी ही एक आहे. पक्षाने बडतर्फी, आणीबाणीच्या काळातील दडपशाही, भ्रष्टाचाराचे आरोप, पक्षातील फूट, दिग्गज नेत्यांचे निधन आणि वारंवार होणारा निवडणुकीतील पराभव या सर्वांवर मात केली आहे. एम.जी.आर. यांच्या उदयानंतर अनेकांनी द्रमुकच्या अंताची भविष्यवाणी केली होती. जयललितांच्या वर्चस्वानंतर अनेकांनी पुन्हा एकदा पक्षाची अंत्यविधी लिहिली. तरीही, पक्ष प्रत्येक वेळी परत आला कारण त्याचा सामाजिक पाया अबाधित राहिलेला असल्याने.
स्टॅलिन यांनी स्वतः अनेक वर्षे करुणानिधींच्या छायेत घालवली. टीकाकारांनी त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत आणि करिष्मा नसलेले म्हणून हिणवले. पण कालांतराने त्यांनी संयमाने पक्षाची रचना पुन्हा उभारली. त्यांनी कल्याणकारी राजकारण मजबूत केले. संपूर्ण भारतात बहुसंख्याक राष्ट्रवाद आक्रमकपणे वाढत असताना त्यांनी द्रमुकची धर्मनिरपेक्ष भूमिका अधिक धारदार केली. त्यांनी संघराज्यवादाचे समर्थन केले. फुटीरतावादी वक्तृत्वात न अडकता त्यांनी सातत्याने तमिळ अस्मिता मांडली. NEET आंदोलने, भाषेवरील वादविवाद, राज्यपाल-राज्य यांच्यातील संघर्ष आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न यांसारख्या प्रसंगी स्टॅलिन यांनी द्रविड विचारप्रवाहाला वैचारिक दिशा दिली. एका निवडणुकीतील पराभवामुळे तो राजकीय पाया नाहीसा झालेला नाही.
यावेळी जे कोलमडले ते म्हणजे निवडणुकीचे गणित. बहुपक्षीय लोकशाहीत, लोकांचा दृष्टिकोन अनेकदा विचारधारेवर मात करतो. संघटनात्मक खोलीवर सेलिब्रिटींचे आकर्षण भारी पडते. सत्ताधाऱ्यांविरुद्धचा राग शांतपणे साचत जातो. कल्याणकारी योजनांचा कंटाळा येऊ लागतो. सत्ताधारी घराण्यांमधील अंतर्गत विरोधामुळे असंतोष निर्माण होतो. प्रत्येक प्रबळ पक्षाला अखेरीस या चक्राचा सामना करावा लागतो.
डीएमकेने निःसंशयपणे चुका केल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विश्वासार्हतेला धक्का बसला. घराणेशाहीच्या सत्तेच्या वाढत्या दृश्यमानतेमुळे सहानुभूतीदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. काही मंत्री अहंकारी वाटले. तळागाळातील लोकांच्या तक्रारींकडे अनेकदा दुर्लक्ष केले गेले. तरुणांचे काही गट नव्या राजकीय देखाव्यांकडे आणि सत्ताविरोधी विचारांकडे आकर्षित झाले.
परंतु अनेक प्रादेशिक नेत्यांच्या अगदी उलट स्टॅलिन अजूनही टीकेसाठी सहज उपलब्ध वाटत होते. त्यांनी स्वतःला कधीही लोकांपासून अस्पृश्य ठेवले नाही कि पूर्णपणे अंधानुकरणाची मागणी करणाऱ्या पूजनीय विभूतीमध्ये स्वत:ला प्रस्तुत केले नाही. आणि कदाचित यामुळेच त्यांचे राजकीय विरोधकही अनेकदा त्यांच्या सभ्यतेची कबुली देतात.
राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नव्हे. तर नेते हरल्यावर कसे वागतात, हेही महत्त्वाचे असते. आणि याच बाबतीत स्टॅलिन आज इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
राजकीयदृष्ट्या कोणालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तसेच द्रमुकला देखील कोणीही इतक्या सहजपणे पुसून टाकू शकत नाही. कारण तामिळनाडूचा राजकीय इतिहास हेच शिकवतो की, “जेव्हा लोक उत्साहापेक्षा विचारधारेचे महत्त्व जाणू लागतात, तेव्हा द्रविड चळवळी पुन्हा पुनरुज्जीवित होतात.” स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्याने आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. आणि जे नेते पराभवाच्या वेळी आपली प्रतिष्ठा जपतात, ते अनेकदा आपल्या पुनरागमनाची पार्श्वभूमी तयार करतात.

(के ए शाजी, दाक्षिणात्य जेष्ठ पत्रकार यांच्या मूळ इंग्रजी फ़ेसबुक पोस्टचा मराठी अनुवाद)


