
मालेगाव शहराचे वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. राज्यभरातून किल्ला पाहण्यासाठी विद्यार्थी व अभ्यासक शहरात येत असतात. सद्यःस्थितीत ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात काकाणी विद्यालयाची शाळा भरत असून पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण हटवून किल्ला अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी दुर्गप्रेमीकडून केली जात आहे.पुरातत्त्व खात्याच्या छत्रपती संभाजी महाराज नगर विभागाने हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. या किल्ल्याचे वयोमान आता २८३ वर्षे असून या ऐतिहासिक ठेवल्याने जिल्ह्याच्या वैभवात भरच पडलेली आहे.
शहराचे वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम सन १७४० मध्ये पूर्ण झाले. सरदार श्रीमंत नारो शंकर राजेबहादूर यांनी मोसम नदीच्या किनाऱ्यावर मालेगाव येथे बांधला. या किल्ल्याची रचना दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे. नदीकिनारी असलेल्या काही किल्ल्यांपैकी मालेगावचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील तरुण किल्ला आहे.
किल्याचे बांधकाम हे पेशवाईच्या काळात झाले होते. त्यानंतर ७८ वर्ष किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला होता. ब्रिटिशांनी
सदर किल्ला १८१८ मध्ये ताब्यात घेतला.मराठा फौजेसी लढाई करूनच ब्रिटिशांना हा किल्ला जिंकला आजही हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. किल्ला सुस्थितीत असला तरी हा अनेक दुर्गप्रेमींना आणि पर्यटकांना माहीत नाही. या किल्ल्याचा उल्लेखही महाराष्ट्राच्या व भारताच्या पर्यटन नकाशात नाही. दिमाखात उभ्या असलेला हा किल्ला शासकीय पातळीवर तसेच स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर उपेक्षित आहे.प्रवेशद्वाराला लागून असलेल्या भिंतीची पडझड होत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा ताबा केंद्र सरकार कडे गेला. किल्ल्याच्या चारही बाजूला मोठा खंदक आहे. आता किल्ल्यातले दगड, सागवानी लाकूड अनेकांनी काढून नेले. किल्ल्याच्या पूर्व आणि दक्षिणेकडचा खंदक बुतत चालला आहे. बरीच वर्षे किल्ल्यामध्ये कचरा , घाणीचे साम्राज्य होते.
असा आहे किल्ला
रंगमहाल
किल्ल्यात रंगमहाल असून त्याची लांबी १०४ फूट व रुंदी ५९ फुट आहे. दक्षिणेकडील भिंतीत चून्याच्या साह्याने बनवलेले मजबूत असे लहान आकाराचे कोंडवाडे आहेत .येथे असलेली दुमजली छत कोसळले असून तेथे फक्त खुणा शिल्लक आहेत. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड बनवण्यात आले आहे .या रंगमाहालाच्या प्रवेशद्वाराच्या दगडांची झीज झाली आहे. ती थांबवण्यासाठी दगडांवर काही रासायनिक लेपन प्रक्रिया करणे आवश्यक आहे. मालेगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला टिकला पाहिजे .

खंदक
किल्ल्याच्या मधल्या भिंतीला लागून चारही बाजूने खंदके आहेत .जमिनीखालच्या दगडांना कापून ते तयार करण्यात आले आहेत. खदकांची रुंदी २५ फूट व खोली २५ फूट तर काही ठिकाणी ३० फूट आहे
भुयारी मार्ग
किल्ल्यावर जाण्यासाठी भिंतीत अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आहेत हे सर्व मार्ग दगडाने बांधण्यात आले आहेत यात ३५ ते ४० जिने आहेत नारोशंकर यांनी ते बनविण्याची शक्यता आहे आज त्याचे अवशेष मात्र आढळून येत नाहीत
मुख्य इमारत
किल्ल्याच्या आतील भागात मुख्य इमारत आहे .पूर्व-पश्चिम ३८५ फूट व उत्तर दक्षिण २८१ फूट लांब आहे. भिंतीला मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी ९ बुरुज बांधण्यात आले आहेत. प्रत्येक बुरुजाचा व्यास २७ फूट ४ इंच आहे. भिंतीची उंची ६० फूट व जाडी ६ फुटीचे आहे तटांना लागून सुमारे दहा फुटांची पायवाट बनवली आहे. त्यामुळे या भागाची जाडी १६ फूट होते याच पायवाट्यातून सैनिक बंदूक व तोफांच्या साह्याने शत्रूंच्या हल्यालव प्रत्युत्तर देत होते. तोफा चालवण्यासाठी खिडक्या बनवल्या आहेत.
पुरातत्व विभागाकडे तक्रार
याबाबत जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग व मालेगाव महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करावे अशी मागणी दुर्गप्रेमीकडून केली जात आहे.



