काॅपी बहद्दरांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष

कालपासून सुरू झालेल्या दहावी परीक्षेत कॉपी झाल्याच्या आणि प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या बातम्यांच्या संदर्भात खातरजमा केली जात असून प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि बाहेर आलेले हस्तलिखित प्रश्नपत्रिका यात बरेच अंतर असल्याचा खुलासा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.
काल सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेतील पहिलाच पेपर मराठीचा होता. या पेपर फुटीच्या घटना जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात घडल्या होत्या परीक्षा सुरू होताच पंधरा मिनिटाच्या आत प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर फिरत होत्या. त्या घटनेच्या संदर्भात सरकारमार्फत प्राथमिक माहिती देण्यात आली. त्यात हस्तलिखित पेपर आणि मूळ प्रश्नपत्रिका यात अंतर असल्याचा खुलासा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे . पण प्रत्यक्षदर्शीने काॅपी झाली असल्याचे सांगितले तर कॉपीमुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाने देखील अनेक ठिकाणी कॉपी झाल्याचे देखील मान्य केले आहे. आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी ही पुष्टी दादा भुसे यांनी केली आहे.
दरम्यान इयत्ता बारावीच्या अकरा फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू असून आत्तापर्यंत या परीक्षेत लातूर विभागीय मंडळांतर्गत २५ कॉपी केस झाले असून या सर्व प्रकरणाच्या संदर्भात जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळावी मिळाली आहे. कॉपीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कॉपी पुरवणारा कर्मचाऱ्यांची बडतर्फी आणि सेंटर कायमचे बंद अशा स्वरूपाच्या शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात देखील वर्गात उत्तरे सांगत असलेले व्हिडिओ चित्रीकरण सापडल्यावर संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यात सुरू असलेल्या बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणात सापडलेल्या विद्यार्थ्यांवर आणि कॉपी पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाबाबत कोणती कारवाई करण्यात येते याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.



