अखंड राहील सौभाग्य…

महिलांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक, सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आपण पाहतच आहोत. या सर्वच क्षेत्रात महिला नावलौकिक कमावता आहेत. काही क्षेत्रात तर महिला पुरुषापेक्षा आघाडीवर आहेत. यासाठी आम्हाला आजपर्यंतच्या महिलांच्या या हक्कासाठी अनेक पातळ्यावर संघर्ष करावा लागला. अनेक वेळा घटनात्मक तरतुदीचा देखील आधार घ्यावा लागला, आणि कायद्याच्या आधारे त्यांचे हक्क त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच आज समाजाचा अर्धा घटक उपेक्षित नाही असे काहीसे समाधानकारक चित्र नजरेस पडते. असे असले तरी महिला आणि सौभाग्य आणि सौभाग्याची सांगड संस्कृती, परंपरा, धर्म यांच्याशी घातलेली होती. दैव योगानं ,कर्म योगानं ज्यांचे सौभाग्य हे हारवले गेले तर अशा विधवा महिलांना समाजातल्या कोणत्याही शुभ कार्याला बोलावन अपशकुन मानलं जात होते.त्यामुळे एकीकडे जोडीदार नसल्याचे दुःख पेलवत असतानाच दुसरीकडे समाजातूनच त्यांना आंनदीत होणाऱ्या कार्यक्रमापासून अलिप्त ठेवल जाऊन पुन्हा दुःखाच्या खाईत लोटण्याचा काम केलं जात होते.
मध्ययुगीन कालावधीपासून विधवा महिलांच्या बाबतीत खूपच अन्यायकारक गोष्टी लादण्यात आल्या होत्या. या सर्व गोष्टी धर्माच्या नावावर निधर्मी पद्धतीने लादल्या होत्या. त्यामुळे एखादी विधवा म्हणजेच गिधाडांची शिकार अशाच प्रकारच्या भावना समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये दिसून येत. म्हणून त्यांच्यावर विविध सामाजिक बंधने लादण्यात येऊन तिला विद्रुप, विकृत आणि बेरंग (पांढरा रंगाची साडी ) आयुष्य जगावं लागत होते. भारतीय संस्कृतीत तर नशीब या वैधव्य आले तर जिवंतपणे मरणयातना सहन करत पतीला मांडीवर घेऊन सरणावर सती जावे लागत असत. अशा परंपरा आम्ही मोडीत काढल्या.
महिला देखील या सर्व गोष्टी परंपरा, संस्कृती, धर्म या नावाखाली सहन करत होत्या. पण अत्यंत समाधानाची आणि आंनदाची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावाने घेतलेल्या सौभाग्याच्या संदर्भातल्या निर्णयाची. आज रथसप्तमी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस. हा शेवटच्या दिवशीच ही आनंददायी बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ती तिळगुळाप्रमाणे गोडवा वाढवणारी. हातकणंगले तालुक्यातील अंबप या गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन गावातील विधवा महिलांना देखील हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावण्याचा ठराव घेतला. त्या गावातील लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकासराव माने यांनी विधवा महिलांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी गत दोन वर्षापासून गावातील सर्व महिलांचे मन परिवर्तन करण्यात मग्न होत्या. शेवटी त्यात त्यांना यश आले आणि विधवांना देखील सौभाग्याचा मान देण्यात आला. त्यांचा सौभाग्य अलंकार हा त्यांना पतीच्या निधनानंतरही कायम ठेवण्यासाठी हा निर्णय होता. आजपर्यंतचे महिलांच्या संदर्भात घेण्यात आलेले निर्णय महिलांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक किंवा इतर क्षेत्रातील उन्नतीसाठी केलेले प्रयत्न होते.याचे श्रेय राजा राममोहन राय यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातल्या महिला मुक्ती कार्यकर्त्यांना जाते. तरीपण या सर्व माध्यमातून आपण महिलांसाठी इतर सर्व क्षेत्रातले दारे खुली केली होती, मात्र सौभाग्याच्या बाबतीत महिलांनीच महिलांवर घातलेली बंधने ग्रामसभेने घेतलेल्या या निर्णायक पावलाने आता तोडले जात असल्याचे चित्र पाहायला मिळेल. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिकक्षेत्रा, बरोबरच सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात देखील महिलांना मानसन्मान मिळवून देईल यात शंका नाही. त्यामुळे विधवा महिलांना समाजातल्या शुभ मानला जाणाऱ्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेला दुःखाचा डोंगर काहीसा हलका होण्यास या निमित्ताने मदत होईल व अवेळी प्राप्त झालेले वैधव्य अखंड सौभाग्यात परिवर्तीत होईल.
विविध क्षेत्रात समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांनी देखील अशा प्रकारच्या प्रसंगाला प्रोत्साहन दिले पाहिजे.समाजातील रूढी परंपरा कळाणुरूप बदलल्या पाहिजेत,त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, शिवाय इतरही काही तुरळक स्वरूपात घडणाऱ्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. यातच समाजाचे हित दडलेला आहे. त्या महिलांचं खूप खूप अभिनंदन


